Monday, February 4, 2013

पुणे विभाग, मराठवाड्यात गंभीर स्थिती : असा दुष्काळ मी आयुष्यात पाहिला नाही!

नवी दिल्ली, दि. ३० (वृत्तसंस्था) - महाराष्ट्रात मराठवाडा आणि पुणे विभागात दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे. असा दुष्काळ मी आयुष्यात पाहिलेला नाही, असे उद्गार खुद्द केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले. दरम्यान, या वर्षी देशात पुरेसे २५ कोटी टन इतके अन्नधान्याचे उत्पादन होईल, अशी माहिती पवार यांनी दिली.

पवार म्हणाले, महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. विशेषत: मराठवाडा आणि पुणे विभागात पिकांना दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. काही भागांत १४ दिवसांनी एकदा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे परिस्थिती खूप गंभीर आहे. असा दुष्काळ मी आयुष्यात पाहिलेला नाही.

उत्पादन २५ कोटी टनांपेक्षा जास्त
२०१२-१३ या वर्षात देशात अन्नधान्याचे उत्पादन २५ कोटी टनांपेक्षा जास्त होईल. गेल्या वर्षीच्या २५.९ कोटी टनांएवढे नसले तरी देशाची गरज भागविण्यासाठी पुरेसे आहे, असे पवार यांनी सांगितले. खरीप हंगामातील तांदळाच्या खरेदीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

त्यामुळे साठवणुकीच्या मुद्द्याकडे लक्ष द्यायला हवे, असे ते म्हणाले. रब्बी हंगामात पिकांखालील क्षेत्र कमी आहे, पण प्रमुख पीक असलेल्या गव्हाची स्थिती उत्तम आहे. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील पश्‍चिम भागात गहू पिकाचे क्षेत्र अधिक आहे.

गेल्या वर्षीइतके ९.३९ कोटी टन गहू उत्पादन अपेक्षित आहे. कडधान्यांचेही क्षेत्र अधिक असल्याचे पवार यांनी सांगितले.
साभार
http://www.saamana.com/2013/January/31/Link/rashtriya5.htm

No comments:

Post a Comment